कोणताही समाज,देश,राष्ट्र घडवण्याचे काम फक्त विद्यार्थी, तरुणच करू शकतात. – आय .पि.एस आदित्य मिरखेलकर.
कोणताही समाज,देश,राष्ट्र घडवण्याचे काम फक्त विद्यार्थी, तरुणच करू शकतात.
– आय .पि.एस आदित्य मिरखेलकर
उमरखेड :-
“कोणताही समाज, देश, राष्ट्र घडवण्याचे काम फक्त विद्यार्थी, तरुणच करू शकतात. त्यामुळे विद्यार्थांनी आपली पात्रता, कौशल्ये ओळखून करिअरची निवड करावी. त्यासाठी प्रयत्नपूर्वक व्यक्तिमत्त्व विकास करावा.” असे प्रतिपादन दारव्ह्याचे आय.पी.एस. अधिकारी आदित्य मिरखेलकर यांनी केले. ते येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात आयोजित इयत्ता १० वी, १२वी व नीटच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापकांच्या गौरव सोहळ्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सरचिटणीस व माजी जिल्हा सरकारी वकील ॲड. पी. व्ही. गाडबैले होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून उमरखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीणकुमार वानखेडे, उमरखेडचे ठाणेदार अमोल माळवे व्यासपीठावर उपस्थित होते.
या गौरव सोहळ्यासाठी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, सचिव डॉ यादवराव राऊत, डॉ. कल्याणराव राणे, दत्तराव शिंदे, सुभाषराव शिंदे, नारायणदास भट्टड, गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम आणि तालुक्यातील शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यासह विविध संस्थाचालक अंबादास साकळे, ॲड. वसीम अहमद, गंगासागर, सौ. सरोज देशमुख, तास्के साहेब आणि तालुक्यातील पालक, नागरिकांची उपस्थिती लाभली.
उमरखेड, महागावचे माजी आमदार तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष, लोकनेते, श्रद्धेय ॲड. अनंतराव देवसरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा गौरव सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा ज्योतिबा फुल विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद देशमुख यांनी केले. संस्थेची स्थापना करण्यामागील उद्देश कथन करून संस्थेचे माजी अध्यक्ष श्रद्धेय ॲड. अनंतराव देवसरकर यांच्यासह संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व समाजाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम घेऊन संस्थेचे वटवृक्षात रूपांतर केले, हे सांगून आजच्या कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली.
उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक व नागरिकांना मार्गदर्शन करताना आदित्य निरखेलकर यांनी, मी कसा घडलो, हे सांगून विविध किस्से व उद्बोधक गोष्टी सांगून मार्गदर्शन केले. व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असलेल्या सहा मुद्द्यांचा उल्लेख केला. निरोगी शरीरात निरोगी मन राहत असल्याने सर्वांनी आपले आरोग्य चांगले ठेवले पाहिजे तसेच आपली वाणी चांगली ठेवावी. विद्यार्थ्यांनी नम्र राहिले पाहिजे, स्त्रियांचा सन्मान करावा. आवडीचे क्षेत्र निवडून करिअर करावे. वाईट कृत्यांसाठी आपला गैरफायदा घेणाऱ्या समाज कंटकापासून दूर राहावे. आदर्शवाद जोपासावा, आयुष्य खूप सोपे आहे, ते सोपे ठेवा. आनंदी राहा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थितांना दिला. आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाने सारे सभागृह भारावून गेले होते.
याप्रसंगी यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी उमरखेड तालुक्यातील संस्थाचालकांचा सत्कार केला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील इयत्ता १० वी, १२वी व नीटच्या परीक्षेत लक्षणीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
गटविकास अधिकारी प्रवीण कुमार वानखेडे यांनी आपल्या मनोगतातून यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, राम देवसरकर हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व आहे. त्यांनी संस्थेच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ॲड.पी.व्ही. गाडबैले यांनी संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश सांगितला सर्व समाजाच्या विकासासाठी संस्थेची स्थापना करण्यात आली.शिक्षणामुळेच आपली प्रगती होते.शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळेच व संस्कार केल्यामुळेच विद्यार्थ्यांची जडणघडण होते. समाजात नैतिक मूल्ये रुजवण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कारित करण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कल्याण होते. विद्यार्थ्यांमध्ये सद्गुणाचा साठा असतो त्याचा विकास करण्याचे काम शिक्षक करीत असतात शिक्षणामुळेच व्यक्ती माणूस बनतो हे लक्षात घेऊन सर्वांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपला विकास करावा असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा फुले विद्यालयातील इंग्रजीचे शिक्षक आर.डी. शिंदे यांनी केले तर आभार प्रा. साधना देवसरकर यांनी मानले.



