परभणी येथील ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ ढाणकी येथे मोर्चा [आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ फाशी देण्यात यावी मागणी.]
- परभणी येथील ‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ ढाणकी येथे मोर्चा
[आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून तात्काळ फाशी देण्यात यावी मागणी.]
ढाणकी / प्रतिनिधी :
परभणी येथे दिनांक ९ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील, भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीला दगडाने ठेचून काढणाऱ्या नराधमाला , तात्काळ फाशी देण्यात यावी, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन देण्याकरिता ढाणकी येथील सर्व नागरिकांनी भव्य आक्रोश मोर्चा काढून, बिटरगांव पोलीस स्टेशनचे ठाणेदार मार्फत गृहमंत्र्याला निवेदन दिले आहे.
सदर मोर्चा गावातील बौद्ध विहारा पासून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज चौक जुने बस स्टॉप ते संविधान चौक इथपर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये गावातील सर्वच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रकरणातील आरोपी विरुद्ध, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून, त्याला त्वरित फाशी देण्यात यावी व त्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी शासन व प्रशासनाकडे निवेदनाच्या माध्यमातून संतप्त नागरिकांनी केली.
यावेळी ढाणकी शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील, नगरपंचायत चे स्वीकृत नगरसेवक खाजाभाई कुरेशी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव गायकवाड, नगरपंचायत पाणीपुरवठा सभापती संबोधी गायकवाड, आजाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे, सेवानिवृत्त माजी सैनिक तुळशीराम गायकवाड, काँग्रेस व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष रुपेश भंडारी, आजाद समाज पार्टी ढाणकी शहराध्यक्ष गोलू मुनेश्वर, करण भरणे, अंबादास मुनेश्वर, आकाश भगत, समाधान नरवाडे, ब्रह्मानंद मुनेश्वर, मिलींद चिकाटे,माजी पंचायत समिती सदस्य रमेश गायकवाड,ओम खोपे सामाजिक कार्यकर्ते,अमोल गायकवाड,निष्ठावान कार्यकर्ते धुळे,शिवसेनेचे एजाज पटेल या नेत्यांसह ढाणकी शहरातील सर्व नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता, ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वात बिटरगांव पोलीस स्टेशनचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात होता.
*चौकट :*
हा संविधानावर हल्ला नसून लोकशाहीवर हल्ला आहे. अशा भ्याड हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. अशा समाजकंठकास कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे.
*सामाजिक कार्यकर्ते*
*ओम अंबादास खोपे*
परभणी येथील घटना अतिशय निंदनीय असून, संपूर्ण आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरला आहे. संविधानावर हल्ला झाल्यानंतर संविधान बचाव यात्रा काढणारे आता कुठल्या बिळात लपले. हे आता आंबेडकरी समाजाने ओळखणे गरजेचे आहे. लोकशाहीला काळीमा फासणाऱ्या त्या कृत्याचा जाहीर निषेध करतो. त्या आरोपीस शासनाने फाशीची शिक्षा दिली पाहिजे.



