संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची तारीख निश्चित

संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलनाची तारीख निश्चित
“संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन” च्या तारखेविषयीची उत्सुकता आता संपली असून आज एकादशीच्या पावन मुहुर्तावर घोषित करण्यात येत आहे. हे पवित्र असे महासंमेलन १७ आणि १८ जानेवारी २०२६ ला घेण्याचे निश्चित झाले आहे. संत नामदेव महाराजांना मानणाऱ्या लाखो भाविकांची उत्सुकता आणि लक्ष संमेलनाच्या तारखेकडे लागलेले होते आता तारीख जाहीर झाल्यामुळे उत्साह शिगेला पोहचला आहे.हे महासंमेलन संत नामदेव महाराजांच्या अजरामर विचारांवर आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेवर आधारित असून, समाजातील सर्व घटकांना एकत्र आणण्याचा एक पवित्र आणि ऐतिहासिक उपक्रम आहे.
संत नामदेव महाराजांनी आपल्या जीवनातून समता, भक्ती, एकात्मता आणि मानवतेचा जो संदेश दिला, तो आजच्या काळात विशेष महत्वाचा आहे. या महासंमेलनाच्या माध्यमातून त्यांच्या विचारांचा जागर केला जाणार आहे आणि विविध कार्यक्रमांद्वारे सामाजिक सलोखा, एकात्मता व सद्भावनेचा प्रचार केला जाणार आहे. या कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी, सडक आणि परिवहन केंद्रीय मंत्री मा. नितीनजी गडकरी,महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस , सर्व राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री , पूज्यनीय सरसंघचालक मोहनजी भागवत तसेच देशातील अनेक गणमान्य व्यक्ती यांना निमंत्रित करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात आपल्या सर्वांच्या सक्रिय उपस्थितीची आणि सहभागाची अत्यंत आवश्यकता आहे.
आपण समाजातील इतर बंधूंना, भगिनींना देखील या कार्यक्रमाबद्दल माहिती देऊन सहभागी करून घ्यावे असे आवाहन आणि विनंती देशातील सर्व प्रमुख समाज बांधवांना आणि कार्यकर्त्यांना आयोजन समिती तर्फे करण्यात येत आहे .
संतश्रेष्ठ शिरोमणी नामदेव महाराज यांचे जीवनकार्य, विचारधारा आणि समतावादी तत्वज्ञान ,राष्ट्रीय एकात्मतेसाठी योगदान संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या कार्याचा जागर करीत, समाजात विसरले गेलेले ऐक्य आणि समानतेचे मूल्य पुन्हा एकदा उजळवण्यासाठी, “संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन” नागपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
आज समाज विविध पोटशाखांमध्ये विभागला गेला आहे. मतभेद, भेदभाव, दुर्लक्ष आणि विस्मृती यामुळे एकतेचा आत्मा हरवत चालला आहे. या महासंमेलनाद्वारे आपण सर्वांनी एकत्र येऊन, सर्व मतभेद बाजूला ठेवून, एकात्मतेचा दीप पुन्हा पेटवण्याची वेळ आली आहे.
या महासंमेलनाचा प्रभाव फक्त एका घटकापुरता मर्यादित राहणार नाही, तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्याचे दूरगामी परिणाम दिसून येतील. येणाऱ्या पिढ्यांना हे संमेलन प्रेरणास्थान ठरेल. संत नामदेव महाराज यांच्यावर आणि त्यांच्या अनुयायांवर जो अन्याय झाला आहे, त्याचे प्रायश्चित या संमेलनाद्वारे घडवण्याची ही ऐतिहासिक संधी आहे.
म्हणूनच आपण सर्वांनी—शहरातील, ग्रामीण भागातील, देशभरातील—लाखोंच्या संख्येने या महासंमेलनात उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन आयोजन समितीने सर्व शिंपी समाज बांधवांना नम्र आवाहन केले आहे की आपण आपली उपस्थिती लवकरात लवकर निश्चित करून, शिंपी समाजातील सर्व बंधू आणि भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या ऐतिहासिक महासंमेलनात सहभागी व्हावे, आणि या न भूतो न भविष्यती अशा भव्य दिव्य समारंभाचे भागीदार व्हावे.
आपला सहभाग म्हणजे केवळ कार्यक्रमाची शोभा वाढवणारा नव्हे, तर संत परंपरेच्या विचारांना पुढे नेणारा एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.
संत नामदेव महाराजांच्या विचारांनी प्रेरित होऊन एक नवा सामाजिक क्रांतीचा अध्याय सुरू करूया!
चला नागपूर…..चला नागपूर
राष्ट्रीय एकात्मतेसाठी……संत नामदेव महाराजांच्या विचारांसाठी……