गुळ कारखान्याच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची नागरिकांची माग
गुळ कारखान्याच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची नागरिकांची माग
मुळावा प्रतिनिधी-:
मुळावा फाटा ते उमरखेड या मुख्य रस्त्यालगत असलेल्या एका गुळ कारखान्यामुळे परिसरात गंभीर प्रदूषण निर्माण झाले आहे. या कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित पाणी व दाट काळा धूर यामुळे परिसरातील नागरिकांसह पंचकृष्ण इंग्लिश मीडियम शाळेतील विद्यार्थ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
सदर गुळ कारखान्यात प्लास्टिक, जुन्या कपड्यांसह इतर घातक साहित्य जाळले जात असल्याने मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरतो. हा धूर थेट शाळेच्या परिसरात जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. अनेक विद्यार्थ्यांना डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास, घशात खवखव व डोकेदुखी यांसारख्या समस्या जाणवत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे.
याशिवाय कारखान्यातून सोडले जाणारे दूषित पाणी रस्त्यालगत साचत असल्याने दुर्गंधी पसरली असून, रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही नाक दाबून प्रवास करावा लागत आहे. हा मार्ग रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी व पालकांनी प्रशासनाकडे तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित गुळ कारखाना चालकावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. कारखान्याला दूषित पाणी व धुराची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे आदेश द्यावेत, तसेच पर्यावरण नियमांचे उल्लंघन होत असल्यास कठोर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षितता धोक्यात येत असताना प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन योग्य ती पावले उचलावीत अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.



