रासेयोच्या संस्कारामधून विद्यार्थी समाज सेवेशी जोडला जातो – प्राचार्य डॉ. माधवराव कदम.
रासेयोच्या संस्कारामधून विद्यार्थी समाज सेवेशी जोडला जातो
– प्राचार्य डॉ. माधवराव कदम
उमरखेड, दि. २६ (वार्ताहर)
राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे काम करते. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण करणे व सेवाभाव रुजविण्याचे काम या शिबिरातून केले जाते. या शिबिरातून होणाऱ्या संस्कारामधून विद्यार्थी समाजसेवेशी जोडला जातो, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांनी केले. ते येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे कनिष्ठ महाविद्यालयाच्या बिटरगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होते.
या समारोप समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आखाडा बाळापूरच्या नारायणराव वाघमारे महाविद्यालयात कार्यरत साहित्यिक प्रा. एस. आर. जाधव उपस्थित होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या शिबिराची सुरुवात २० डिसेंबर रोजी झाली. मागील सात दिवसात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये शिबिर परिसर स्वच्छता, ग्रामस्वच्छता, ग्राम सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, दंतचिकित्सा शिबिर, मोफत औषधी वाटप, कायदेविषयक मार्गदर्शन, एड्स जनजागृती व जीवनमूल्य, महिला सक्षमीकरण मोफत पशु चिकित्सा व मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरातील विद्यार्थ्यांकडून बंधारा बांधण्यात आला. या शिबिरादरम्यान मान्यवरांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यात यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत, गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड, सुवर्णा इंगोले, वनपरिक्षेत्र अधिकारी, तसेच उमरखेड शहरातील सर्व डॉक्टर, औषधी विक्री संघटना, न. पा. मुख्याधिकारी महेश जामनोर, पशुचिकित्सा विभागातील सर्व अधिकारी, बिटरगावच्या सरपंच गयाबाई शेवकर, गावचे ज्येष्ठ नागरिक प्रकाश नरवाडे, दिलीप नरवाडे, पोलीस पाटील नंदाताई नरवाडे, ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष बंडूभाऊ नरवाडे यांनी या शिबिरास मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी बौद्धिक मार्गदर्शन, सकाळी योगासने, श्रमदान व संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम अशाप्रकारे शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवप्रसाद इंगळे, प्रा. नितीन ठाकरे, प्रा. दिपाली हरण, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक संजय देशमुख, सर्व शिक्षक व विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी ग्रामस्थांकडून निरोप घेताना विद्यार्थी व ग्रामस्थ भारावून गेले होते.



