शेतकरी सन्मान योजनेतून शेतकरी पाल्यांना टॅबचे वाटप
शेतकरी सन्मान योजनेतून शेतकरी पाल्यांना टॅबचे वाटप
उमरखेड : अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाले असून, सध्या शेतकरी दुःखी आहे. शेतकरी सुखी व्हावा यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार किसन वानखेडे यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या २१ व्या आमसभेच्या निमित्ताने स्व. नारायण पाटील वानखेडे स्मृती प्रित्यर्थ शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लकी ड्रॉद्वारे उच्च शिक्षण घेणाऱ्या शेतकरी पाल्यांना अर्ध्या किमतीत टॅब वाटप कार्यक्रम पार पडला. या उपक्रमामुळे वैद्यकीय, फार्मसी, अभियांत्रिकी आणि इतर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत मिळणार आहे.
या कार्यक्रमात आमदार किसन वानखेडे, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे, माजी आमदार नामदेव ससाने, सभापती कृष्णा देवसरकर, उपसभापती कृपाल आडे, संचालक भीमराव चंद्रवंशी, डॉ. अंकुश देवसरकर, रमेश चव्हाण यांच्यासह संचालक मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहान मुलांच्या हस्ते चिठ्या काढून निवड झालेल्या विद्यार्थ्यांना टॅब वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकरी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



