पाण्या साठी महिलांचा आक्रोश विहिरी कोरड्या, घागऱ्या रस्त्यावर गटविकास अधिकऱ्याचा दालनासमोर ठिय्या आंदोलन
पाण्या साठी महिलांचा आक्रोश
विहिरी कोरड्या, घागऱ्या रस्त्यावर !
गटविकास अधिकऱ्याचा दालनासमोर ठिय्या आंदोलन
उमरखेड:- एप्रिलच्या उष्णतेने आधीच सणसणीत भाजलेले गाव आता पाण्याअभावी अक्षरशः होरपळू लागले आहे. निंगनूरच्या हिरामण नगर भागात गावकुसाबाहेरील सर्व विहिरी आटल्याने नागरिकांना टंचाईचं गंभीर संकट भेडसावत आहे. व्याकुळ महिला भर उन्हात घागऱ्या घेऊन गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात धडकल्या आणि पाणी देता का पाणी’ असा ठाम आवाज ठोकून प्रशासनाला जागं केलं.
हिरामण नगर येथील महिलांनी भर उन्हात हातात घागरी आणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनासमोर ठिय्या मांडला याबाबत दखल घेऊन गटविकास अधिकारी किरण कोळपे यांनी जलजीवन मिशनचे अभियंता सौरभ सोनी यांना बोलावून हिरामण नगर येथील पाणीटंचाई बाबत पर्यायी व्यवस्था काय करण्यात येईल याबाबत चर्चा केली व पाणीटंचाई समस्या लवकरच दूर करू असे आश्वासन घागर मोर्चा घेऊन आलेल्या महिलांना दिले.
चौकट :- महिलांचा पंचायत कार्यालयावर घागर मोर्चा
निंगनुर ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या हिरामण नगर येथे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई झाली आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. ग्रामपंचायत ची अधिग्रहण विहीर कोरडी पडली आहे . ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशनचे पाईपलाईनचे काम अर्धवट स्थितीत राहिले आहे. शासनाकडून जल जीवन ची कामे रमत गमत होत असल्याने गावकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी पर्यायी व्यवस्था करावी यासाठी आम्ही पाठपुरावा करीत आहोत. -सुरेश बरडे
सरपंच ग्राम पंचायत निंगनूर



