स्वातंत्र्य सैनिक बंकटलालजी भुतडा ट्रस्टकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ५७ हजार शेतकरी व शेतमजुरांना दोन लाखांचा अपघाती विमा; सामाजिक उपक्रमातून नवा आदर्श उमरखेड | प्रतिनिधी

youtube

स्वातंत्र्य सैनिक बंकटलालजी भुतडा ट्रस्टकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ५७ हजार शेतकरी व शेतमजुरांना दोन लाखांचा अपघाती विमा; सामाजिक उपक्रमातून नवा आदर्श

उमरखेड | प्रतिनिधी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्य सैनिक बंकटलालजी भुतडा ट्रस्टच्या वतीने उमरखेड येथील राजस्थान भवन येथे ५७ हजार अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचा मोफत अपघाती विमा उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रतिनिधिक स्वरूपात लाभार्थी शेतकरी व शेतमजुरांना विमा करारपत्रांचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा समन्वयक नितीन भुतडा म्हणाले की, “समाजहित डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबविला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस केवळ औपचारिकरीत्या साजरा न करता संपूर्ण महिनाभर अधिकाधिक शेतकरी व शेतमजुरांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा आमचा संकल्प आहे.”

ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. “या भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम, प्रगत आणि आत्मनिर्भर व्हावा, हीच आमची अपेक्षा आहे,” असेही त्यांनी सांगितले.

नितीन भुतडा यांनी नांदेड जिल्ह्यातील एका प्रयोगशील तरुणाचा उल्लेख करत सांगितले की, त्या तरुणाने स्वतःच्या विवाहावरील अनावश्यक खर्च टाळून संपूर्ण गावाचा अपघाती विमा उतरविण्याचा अभिनव सामाजिक उपक्रम राबविला. अशा प्रेरणादायी कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडू शकतो, असे त्यांनी नमूद केले.

प्रास्ताविकात सर्व राष्ट्रीयीकृत व सहकारी बँकांनी पुढाकार घेऊन अधिकाधिक शेतकरी व शेतमजुरांचा अपघाती विमा काढण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजय खडसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कृष्णा देवसरकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष सुदर्शन रावते, विविध बँकांचे व्यवस्थापक, शेतकरी नेते जगदीश नरवाडे, रमेश चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसेच अनेक शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात प्रतिनिधिक स्वरूपात दोन शेतकरी व शेतमजुरांनी मनोगत व्यक्त करून या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी केले.

या उपक्रमामुळे उमरखेड व महागाव तालुक्यातील हजारो शेतकरी व शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा कवच मिळणार असून, वाढदिवसाचे औचित्य साधत समाजोपयोगी कार्य करण्याचा आदर्श स्वातंत्र्य सैनिक बंकटलालजी भुतडा ट्रस्टने निर्माण केल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

1 thought on “स्वातंत्र्य सैनिक बंकटलालजी भुतडा ट्रस्टकडून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त ५७ हजार शेतकरी व शेतमजुरांना दोन लाखांचा अपघाती विमा; सामाजिक उपक्रमातून नवा आदर्श उमरखेड | प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!