ज्यांनी शिवाजी चौकात पुतळा उभारण्यासाठी विरोध केला तेच आता श्रेय घेण्यासाठी समोर शिवभक्तांच्या आंदोलनामुळेच पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीची पत्रकार परिषदेतून माहिती
ज्यांनी शिवाजी चौकात पुतळा उभारण्यासाठी विरोध केला तेच आता श्रेय घेण्यासाठी समोर
शिवभक्तांच्या आंदोलनामुळेच पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समितीची पत्रकार परिषदेतून माहिती
उमरखेड :-
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा छत्रपती शिवाजी महाराज चौकातच उभारला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन गेल्या अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कृती समिती विविध आंदोलने ,उपोषणे करीत आहे. ज्यांनी शिवाजी चौकात पुतळा उभारण्यासाठी विरोध केला तेच आता श्रेय घेण्यासाठी समोर येत आहेत. गेल्या 22 जुलै रोजी समितीच्या व मराठा मावळा संघटनेच्या आणि शिवभक्तांनी केलेल्या आंदोलनामुळेच शिवाजी चौकात पुतळा उभारण्याची प्रशासकीय तयारी सुरू झाली असल्याचे प्रतिपादन समितीचे गजानन देशमुख यांनी 24 जुलै रोजी विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.
यावेळी समितीचे अध्यक्ष अभय पवार, रमेश चव्हाण, संजय बिजोरे , सिद्धेश्वर जगताप , अर्जुन बर्डे , प्रवीण देशपांडे, सदानंद सूर्य ,दर्शन भंडारी, गणेश रावते यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की , नगर परिषदेवर कोणाचीही सत्ता नसताना व प्रशासक असताना सुद्धा काही राजकीय व्यक्तींनी श्रेय घेण्याची लढाई सुरू केली आहे पण खरे पाहता छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळाकृती समितीने गेल्या अनेक वर्षापासून विविध आंदोलने केली. त्यामध्ये शोले स्टाईल आंदोलन, आमरण उपोषण, साखळी उपोषण , आत्मकलेश आंदोलन, वेळोवेळी विविध निवेदने दिली. यासारख्या विविध आंदोलनातून पुतळ्याची मागणी रेटून धरली होती. दुकानदारांना कोर्टात पाठवून पुतळा शिवाजी महाराज चौकात उभारला जाऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करण्यात आले. न्यायालय मध्ये सुद्धा कोणत्याही तारखेला वकील किंवा कर्मचारी उपस्थित राहिला नाही पाहिजे यासाठी प्रयत्न केले. शिवरायांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात होऊच नाही यासाठी प्रयत्न करणारे व्यक्ती आज समोर येऊन आम्हीच या ठिकाणी पुढाकार घेऊन पुतळा साकारणार आहोत आणि आम्हीच महत्त्वाची भूमिका घेऊन गाळेधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असे सांगत आहेत पण स्वतःच्या हाताने स्वतःचीच पाठ किती थोपटायची ? असाही प्रतिप्रश्न देशमुख यांनी यावेळी उपस्थित केला. खरे पाहिले तर समितीच्या आंदोलनामुळेच प्रशासनाने धसका घेऊन आम्हाला काल झालेल्या आंदोलनात एक महिन्याच्या कालावधीत पुतळ्यासाठी चबुतरा तयार करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे आणि त्यानुसार प्रशासकीय तयारी सुरू आहे चबुतरा पूर्ण होईपर्यंत आमचे साखळी उपोषण नगरपरिषदेच्या समोर सुरूच आहे आणि आम्ही त्याचा पाठपुरावा करीत आहोत असेही यावेळी अध्यक्ष अभय पवार म्हणाले.
चौकट ।
जनआंदोलनामुळेच पुतळ्याच्या कामाला सुरुवात होणार
दि 9 जुलै रोजी कृती समिती व मराठा मावळा या संघटनेने नगरपरिषद येथे मुख्याधिकारी यांना जन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्याप्रमाणे दि 22 जुलै रोजी शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने नगर परिषदेच्या प्रांगणासमोर जनआंदोलन केले व याचे फळ म्हणून प्रशासनाने शिवप्रेमींच्या मागण्या मान्य करीत एक महिन्याची मुदत देण्यात आली. यामध्ये कुठल्याही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप नसून श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आयोजित पत्रकार परिषदेतून कृती समिती च्या वतीने सांगण्यात आले.
चौकट
न पा मध्ये प्रशासक असताना राजकीय पुढार्यांनी हस्तक्षेप केला कसा ?
नगर प्रशासनाने शिवप्रेमींचे मागण्या मान्य करत एक महिन्याची मुदत दिली असून काही राजकीय व्यक्तींनी व जीनप्रेस च्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन गाळेधारकांना जागा देण्याचे सांगितले परंतु नगरपरिषद मध्ये प्रशासक असताना राजकीय पुढारी हस्तक्षेप करतातच कसे ? असा प्रश्न समितीच्या वतीने उपस्थित करण्यात आला.
चौकट
भाजपा जिल्हा समन्वय व आमदार ससाने यांनी पुतळ्याला ग्रहण लावले
मागील तीन वर्षापासून नगरपरिषदेच्या अग्निशमनच्या जवळ छत्रपती शिवरायांचा पुतळा बंदिस्त अवस्थेत असून त्यांना महाराजांचा पुतळा मोकळा करता आला नाही का ? महाराजांच्या पुतळ्याला ग्रहण लावण्याचे काम भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व आमदार नामदेव ससाने यांनी केले. असे मत रमेश चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून व्यक्त केले.

