आगामी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेची कुठलीही कसर ठेवणार नाही – अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप
आगामी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेची कुठलीही कसर ठेवणार नाही
अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप
उमरखेड :-
श्रीराम नवमी,महावीर जयंती हनुमान जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी आगामी उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षेची कुठल्याही प्रकारची कसर ठेवली जाणार नाही .गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी सर्वांनी एकमेकांच्या भावना ओळखून आपापले धार्मिक उत्सव शांततेत पार पाडावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांनी केले आहे .
ते आज दि 4 एप्रील रोजीस्थानिक न प च्या राजे छत्रपती संभाजी महाराज उद्यान सभागृहात पोलीस उपविभागाअंतर्गत आयोजित शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना बोलत होते .
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी आमदार किसनराव वानखेडे,तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप हे होते .यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ,माजी आमदार विजयराव खडसे , एड .संतोष जैन,जिनिंग प्रेस चे अध्यक्ष शिवाजीराव माने, एड .संजीवकुमार जाधव ,प्रा डॉ अनिल काळबांडे, एम आय एम चे इरफान ताऊ ,श्रीनाथ उल्लंगवार , सिद्धार्थ दिवेकर ,महेश आलट नायब तहसीलदार कोरवते आदींची मंचावर उपस्थिती होती .
यावेळी पुढे बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप म्हणाले की,आगामी रामनवमी ,महावीर जयंती ,हनुमान जयंती डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना शहरातून निघणाऱ्या मिरवणुकींना समाजकंटकांकडून गालबोट लागू नये यासाठी पोलिसांकडून सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात येणार असून तीनशेच्या वर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत संपूर्ण शहर असून समाजकंटकांवर आमची करडी नजर आहे .पोलीस यंत्रणा जनतेच्या सोयीसाठी असून आम्ही एकविसाव्या शतकातील पोलीस आहोत .इंग्रज अधिकारी नाही .नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी आमची आहे .यासाठी सर्व समाज घटकांनी पोलिसांना सहकार्य करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी .समाजकंटकाकडून उत्सव कार्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाल्यास पोलीस कदापिही बघ्याची भूमिका घेणार नाही ,प्रसंगी कठोर पावले उचलण्याची पोलीस प्रशासनाची तयारी आहे असे ठणकावून सांगितले . शिक्षण घेणाऱ्या मुलांना मिरवणुकीत चुकीचे कृत्य करण्यापासून सामाजिक कार्यकर्त्या जाणकारांनी परावृत्त करावे जेणेकरून त्यांचे भविष्याचे नुकसान होणार नाही ,मिरवणुकीत डीजेच्या आवाजाची मर्यादा आयोजकांनी ठेवावी ,डीजेवर कोणाच्याही भावना दुखावतील अशी आक्षेपार्ह गाणी नसावी वेळेचे बंधन पाळावे , जेणेकरून जेष्ठ नागरिक महिला व बालकांनाही उत्सव मिरवणुकीचा आनंद घेता आला पाहिजे . अशा सूचना त्यांनी आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून मांडल्या .यावेळी आमदार किसनराव वानखेडे यांनी सर्वांनी आपले सणउत्सव एकमेकांना सहकार्य करून गुण्यागोविंदाने पार पाडावे व शहराचा लौकिक वाढवावा .असे आवाहन केले .भाजपा समन्वयक नितीन भुतडा म्हणाले की,मिरवणुकी दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी गाव आपले आहे असे समजून सर्वांनी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे .अति संवेदनशील शहर म्हणून असलेली जुनी ओळख पुसल्या जावी यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे .यावेळी एड .संतोष जैन , एड .संजीव कुमार जाधव प्रा . डॉ . अनिल काळबांडे ,शिवाजी माने,सिद्धेश्वर जगताप ,श्री उल्लंगवार ,सिद्धार्थ दिवेकर यांनी आदींनी आगामी सण शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली .कार्यक्रमाचेप्रास्ताविक ठाणेदार शंकर पांचाळ यांनी केले .यावेळी महागाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार निळे, पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे,बिटरगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार कैलास भगत,दराटी पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश वाघमारे यांची उपस्थिती होती . सूत्रसंचालन गजानन शिंदे यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड यांनी मानले .



