ढाणकीत महिन्यातून एकदाच नळाला पाणी,  प्रहारचा तीव्र आंदोलनाचा इशारा

youtube

ढाणकीत महिन्यातून एकदाच नळाला पाणी येते,  प्रहारचा तीव्र आंदोलनाचा इशारा

उमरखेड (प्रतिनिधी) :

उमरखेड तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या ढाणकीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा गंभीर प्रश्न कायम आहे. सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की नागरिकांना महिन्याला केवळ एकदाच नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर युवा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

ढाणकी शहरात गेल्या २५ वर्षांपासून पाणीटंचाईची समस्या आहे. सध्या महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. एका ५०० लिटरच्या पाण्याच्या टाकीसाठी १३० रुपये मोजावे लागत असून, एका चार जणांच्या कुटुंबाला महिन्याकाठी किमान एक हजार रुपये खर्च येतो. ही परिस्थिती सामान्य, विशेषतः मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांसाठी मोठा आर्थिक बोजा ठरत आहे.

ढाणकी नगरपंचायतची स्थापना होऊन पाच वर्षे झाली असली तरी पाणी प्रश्न सुटलेला नाही. १९९५ साली पैनगंगा नदीपात्रातून गांजेगावमार्गे पाणीयोजना राबवण्यात आली होती. २००० मध्ये फिल्टर यंत्रणाही बसवण्यात आली. मात्र पाटबंधारे विभागाच्या थकबाकीमुळे व विहिरीत गाळ साचल्याने विहिरीतील मोटारी बंद पडल्या आहेत. पाइपलाइनही गाळामुळे फुटल्या आहेत.

सध्या गांजेगाव येथील नदीच्या बंधाऱ्यातून तात्पुरत्या स्वरूपात पाणीपुरवठा होत असून, शहरातील १७५ वाल्वपैकी केवळ १० वाल्वद्वारेच पाणी सोडले जाते. त्यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होत आहे, असा आरोप करण्यात आला.

यासंदर्भात युवा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अभिजीत गंधेवार यांनी नगरपंचायतला निवेदन दिले असून, दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा न झाल्यास ढाणकी नगरपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. या वेळी भास्कर गंजेवाड, श्रावण चांदले, मनोज पोंगाणे, रोहित बेंडके, कृष्णा कदम, रघुनाथ खंदारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट 1: मोलमजुरी करणाऱ्यांचे हाल

ढाणकीत महिन्याला एकदाच नळाला पाणी येते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागते. एका टाकीसाठी १३० रुपये मोजावे लागतात. यामुळे रोजंदारी करणाऱ्या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे. पाण्यासाठी पैसे कुठून आणावेत, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

चौकट 2: वर्षात केवळ २० वेळाच नळाला पाणी!

ढाणकीमध्ये उन्हाळ्यात महिन्यातून एकदाच आणि इतर काळात दोन वेळा पाणीपुरवठा होतो. म्हणजे वर्षभरात केवळ २० वेळाच नळाला पाणी येते. ही परिस्थिती पाहता ढाणकीची अवस्था वाळवंटातल्या गावांपेक्षाही बिकट झाली आहे.

Google Ad
Google Ad

1 thought on “ढाणकीत महिन्यातून एकदाच नळाला पाणी,  प्रहारचा तीव्र आंदोलनाचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!