उमरखेड-महागाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी आमदार किसनराव वानखेडे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना
उमरखेड-महागाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीकविम्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी आमदार किसनराव वानखेडे यांची विधानसभेत लक्षवेधी सूचना
उमरखेड : गेल्या खरीप हंगामात अतिवृष्टी, अनियमित पाऊस आणि विविध नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः सोयाबीन, कापूस, तूर, ऊस व हळद या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर उमरखेड-महागाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंजि. किसनराव मारोती वानखेडे यांनी महाराष्ट्र विधानसभेत लक्षवेधी सूचना दाखल केली आहे.
यवतमाळ जिल्हा हा आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त आणि संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखला जातो. उमरखेड, महागाव आणि पुसद तालुक्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाही शासनाने जाहीर केलेल्या पीकविमा नुकसानभरपाई योजनेतून यवतमाळ जिल्ह्याला वगळण्यात आल्याचा गंभीर मुद्दा आमदार वानखेडे यांनी उपस्थित केला आहे.
या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधित अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष, विमा कंपन्यांचा मनमानी कारभार आणि पारदर्शकतेचा अभाव यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा लाभ व आर्थिक मदत मिळावी, तसेच यवतमाळ जिल्ह्याला पीकविमा योजनेत समाविष्ट करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार किसनराव वानखेडे यांनी केली आहे. यासंदर्भात शासनाने केलेली आणि करावयाची कार्यवाही तसेच शासनाची भूमिका काय आहे, याबाबत सभागृहात चर्चा व्हावी, अशी विनंती त्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.
या लक्षवेधी सूचनेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा विधानसभेच्या पटलावर वाचा फुटली असून, शासनाच्या निर्णयाकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागले आहे.—

